Harshvardhan Patil/ऊस शेतीत AI तंत्रज्ञानाचा प्रसार; निरा-भिमा कारखान्यात आज विशेष मार्गदर्शन.

इंदापूर,दि २७
- शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन आज (सोमवार) दुपारी १.३० वाजता भाग्यरत्न सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे.
या परिसंवादाला कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली)चे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग तसेच विज्ञान केंद्र, बारामती येथील AI विभाग प्रमुख तुषार जाधव हे तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनवाढ, साखरेचा उतारा वाढविणे, जमिनीचे वैज्ञानिक व्यवस्थापन, पिकांचे अचूक निरीक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग याबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली जाणार आहे.
निरा-भिमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मागील हंगामापासून AI आधारित तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून त्याचे उत्साहवर्धक परिणाम दिसून येत आहेत. ऊस उत्पादकांना आधुनिक शेतीकडे वळविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या परिसंवादाचा लाभ कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे आणि कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी केले आहे.



