राजीनामे, नाराजीनाट्य.? जय पवारांची पत्रकार परिषद रद्द होण्याचं नेमकं कारण काय?

पुणे,दि १०
- उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातावर सातत्याने संशय व्यक्त केला जात आहे.अजित पवार यांचा बारामतीत झालेला विमान अपघात होता की घातपात होता, यावरून राज्यात राजकीय प्रचंड गदारोळ सुरू आहे. त्यावरून राजकारणही तापलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासह आमदार अमोल मिटकरी हेदेखील संशय व्यक्त करत आहेत. हे सगळं सुरू असतानाच एक अंतर्गत बाब समोर आली आहे. दिवंगत अजित यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच त्यांच्या पक्षाच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावर नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
अजित यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीमुळे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्ता हाती येण्याच्या भीतीमुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त केले. परंतु त्यांना किंवा त्यांच्या दोन्ही मुलांना बोलू किंवा काहीही करू दिले जात नाही, असा दावा केला जात आहे. यामुळे सुनेत्रा पवारच द्विधा मनस्थितीत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अजित पवार यांचे धाकटे चिंरजीव जय पवार आज पत्रकार परिषद घेणार होते. पण जय पवार यांची पत्रकार परिषद अचानक रद्द कऱण्यात आली. त्यामुळे सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांना बोलण्यापासून रोखले जात असल्याची अटकळ बांधली जात आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अनपेक्षित मृत्यूला आज ४० दिवस उलटून गेले. शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी, माजी मंत्री महादेव जानकर आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी यामागे कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अजितदादा यांच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यानंतरही या सर्व घडामोडींबाबत मौन बाळगल्याबद्दल सुनेत्रा यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण सुनेत्रा पवारांना या प्रकरणात बरेच काही सांगायचे आहे, परंतु त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षातील नेते आणि महायुतीमधील काही वरिष्ठ नेते त्यांच्यावर बोलू नये म्हणून दबाव आणत असल्याचे बोलले जात आहे. पण सुनेत्रा यांनीही यापूर्वीच या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली.
दिवंगत अजित यांचे पुत्र जय पवार यांनी सोमवारी (९ मार्च) आयोजित केलेली पत्रकार परिषद बोलावली होती. पण ऐनवेळी काही अपरिहार्य परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. जय पवार व्हीएसआर एअर कंपनीबाबत बोलणार होते, त्यासाठी एक आठवड्यापूर्वी जय पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, या व्हिडीओमध्ये ज्यामध्ये व्हीएसआरचे मालक रोहित पायलटच्या सीटवर झोपलेले दिसत होते.यासंदर्भात बोलण्यासाठी जय पवार आज पत्रकार परिषद घेणार होते. पण जय पवारांची पत्रकार परिषद ऐन वेळी रद्द करण्यात आली.
पत्रकार परिषद रद्द झाल्यानंतर जय पवार यांनी, हे “अत्यंत गंभीर आणि धक्कादायक” असल्याचे म्हटले आहे. तसेच डीजीसीएने सर्व व्हीएसआर उड्डाणे तात्काळ रद्द करावीत आणि तपास पूर्ण होईपर्यंत रोहित सिंग यांना अटक करावी, अशी मागणी जय पवारांकडे केली. बारामती विमान अपघातातील व्हीएसआर कंपनीबद्दल खुलासे होण्याची वाट पाहणाऱ्यांना खात्री होती की जय त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मीडियासमोर काही खळबळजनक खुलासे करू शकतात, परंतु जय पवारांच्या पत्रकार परिषदेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असं म्हटलं आहे.
तटकरेंच्या विरोधात राजीनाम्यांची लाट
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सध्या गोंधळात आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यशैलीवर असमाधानी असल्याने, अनेक वरिष्ठ अधिकारी एकामागून एक राजीनामे देत आहेत. या राजीनाम्यांमुळे पक्षातील अंतर्गत कलह पूर्णपणे उघड झाला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गौतम खरात यांनी पक्षातील त्यांच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला आहे. सुनील तटकरेंवर निशाणा साधत खरात म्हणाले की, पक्षात फक्त निवडक व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाईकांनाच सन्मान आणि पदे दिली जात आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि राज्य पातळीवरून अपेक्षित पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळत नाही असा आरोप त्यांनी केला.



