सरडेवाडी टोल नाक्यावर बेकायदेशीर दादागिरीचा स्फोट! राज्यातील विद्यमान मंत्र्याची गाडी सोडण्यास विलंब.
मंत्र्यांनाच असा अनुभव तर सामान्यांचे काय.

इंदापूर,दि १५
- इंदापूर तालुक्यातील पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोल नाका काल दि.१४ रोजी प्रचंड वादाच्या केंद्रस्थानी आला होता. राज्यातील एका विद्यमान व प्रभावशाली मंत्र्यांची गाडी टोल नाक्यावर अडवून सोडण्यास विलंब लावल्याने परिस्थिती चिघळली आणि टोल प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश झाला.
खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मंत्री दि.१४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त इंदापूर तालुक्यातील विविध गावांना भेट देत होते. अभिवादन कार्यक्रमासाठी जात असताना सरडेवाडी टोल नाक्यावर त्यांच्या वाहनाला थांबवण्यात आले. आवश्यक परवानगी आणि ओळख असूनही वाहन पुढे सोडण्यात उशीर केल्याने मंत्री संतप्त झाले.
यावेळी मंत्र्यांनी टोल प्रशासनातील अधिकाऱ्यांना जागेवरच जाब विचारत कडक शब्दांत सुनावले. परिस्थिती इतकी गंभीर बनली की, मंत्र्यांनी स्वतः टोल नाक्यावर उभे राहून प्रशासनाने उभारलेली बॅरिकेट्स आणि लोखंडी अडथळे हटवले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे काही काळासाठी सर्व वाहनांना कोणताही अडथळा न येता मुक्तपणे मार्गक्रमण करता आले.
सरडेवाडी टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांना वारंवार अडवणे, अनावश्यक शुल्क वसूल करणे, तसेच कर्मचाऱ्यांकडून अरेरावी आणि दमदाटी केल्याच्या तक्रारी अनेक वेळा पुढे आल्या आहेत. मात्र आजच्या घटनेने या सर्व तक्रारींना प्रत्यक्ष पुष्टी मिळाल्याचे चित्र दिसत आहे.
या घटनेनंतर टोल प्रशासनाची कार्यपद्धती, नियमांची अंमलबजावणी आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, जर राज्यातील मंत्र्यांनाच अथवा त्याच तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे अडवले जात असेल, तर सामान्य नागरिकांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल, याची कल्पनाही न केलेली बरी, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत आहे.



