इंदापूरमध्ये ‘फुलचंद पान’चा कहर; तरुण पिढी नशेच्या विळख्यात?

इंदापूर,दि १०
- इंदापूर शहरात सध्या ‘फुलचंद पान’ या नावाने विक्री होणाऱ्या पानाबाबत गंभीर शंका निर्माण होत असून, हे केवळ चवीपुरते मर्यादित नसून त्यामध्ये गांजा किंवा इतर अमली पदार्थ मिसळले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. विशेषतः महाविद्यालयीन तरुणांमध्ये या पानाची मोठी क्रेझ निर्माण झाली असून, ‘कडक फुलचंद’ म्हणून ओळखले जाणारे हे पान युवकांना आकर्षित करत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, इंदापूरमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हे पान खुलेआम विकले जात असून, त्याच्या सेवनानंतर काही तरुण विचित्र वर्तन तसेच चक्कर येणे, मळमळ, उलटी, करताना दिसत आहेत. त्यामुळे या पानामध्ये नेमके काय मिसळले जाते, याबाबत संशय अधिक गडद होत आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या पानांमध्ये रासायनिक घटक किंवा अज्ञात पदार्थांचा वापर केल्यास त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे व्यसनाधीनता वाढण्याचा धोका असून, मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येऊ शकते.
दरम्यान, नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) याची तातडीने दखल घेऊन फुलचंद पानाची चाचणी करावी, तसेच संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या पानामध्ये कोणते घातक रसायन वापरले जात आहे, याचा तपास होणे अत्यावश्यक ठरत आहे.
सध्या इंदापूरमध्ये ‘फुलचंद पान’ हे तरुणांना नशेच्या जाळ्यात ओढणारे आणि आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरणारे माध्यम बनत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.



