विशेष
सरडेवाडी येथे पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू.

इंदापूर,दि.१
- इंदापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सरडेवाडी गावच्या हद्दीत नुकसानग्रस्त शेती पिकाच्या पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सरडेवाडी गावचे सरपंच आप्पा माने यांनी वैयक्तिक लक्ष घालून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला असून प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून पंचनामे लवकर पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मागील आठवड्यात इंदापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ऊस,केळी,पेरु,कांदा,मका,यासह अनेक हंगामी पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले असून शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.



