संपादकीय

इंदापूर तालुक्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी; ठेकेदारीच्या राजकारणावर वज्राघात.

संपादकीय, (जितेंद्र जाधव)

  • इंदापूर तालुक्यात आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका जवळ येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट)मध्ये नवचैतन्य दिसून येत आहे. यावेळी पक्ष नेतृत्वाने नव्या दमाच्या, प्रामाणिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना अधिक संधी देण्याचा मनोदय स्पष्ट केला आहे.गेल्या काही वर्षांत पक्षाच्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क राखण्यापेक्षा ठेकेदारीच्या कामांमध्ये स्वतःला गुंतवून घेतले असल्याचे दिसून आले. या प्रवृत्तीमुळे पक्षवाढ खुंटली, संघटनात्मक कामकाजावर परिणाम झाला आणि जनतेचा विश्वास कमी झाला. त्यामुळे यंदा पक्ष नेतृत्वाने या ठेकेदारी संस्कृतीवर कठोर भूमिका घेतली आहे.

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम मुळे असूनही काही जुने नेते व पदाधिकारी गेल्या काही काळात जनतेपासून दूर गेले. त्यांनी विकासाच्या नावाखाली ठेकेदारी कामे स्वीकारत स्वतःच्या आर्थिक उन्नतीवर अधिक भर दिला. परिणामी, पक्षाचे कार्यकर्ते, विशेषतः तरुण वर्ग, नाराज झाला.ज्यांच्या माध्यमातून पक्षाचा पाया मजबूत व्हायला हवा होता, तेच कार्यकर्ते वैयक्तिक स्वार्थात अडकले, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आता नव्या कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्यकर्ते सामाजिक कार्यात सक्रीय, स्वच्छ प्रतिमेचे आणि जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहेत.

तालुक्यातील अनेक नवे चेहरे गेल्या काही वर्षांत सातत्याने गावपातळीवर पक्षाची ध्वजवाहक म्हणून काम करत आहेत. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेत त्यांना निवडणुकीत तिकीट देण्याची तयारी सुरू केली आहे.पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, “काम करणाऱ्यांनाच संधी आणि भ्रष्टाचारमुक्त राजकारण” हा अजित पवार गटाचा यावेळी प्रमुख ध्येयवाक्य ठरणार आहे.

अजितदादांचा ठाम संदेश: “राजकारण करा, ठेकेदारी नव्हे”

अजित पवार यांनी अलीकडेच एका बैठकीत स्पष्ट शब्दांत सांगितले होते,“ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नका, आणि ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचे आहे त्यांनी राजकारणात येऊ नका.”

या विधानाने पक्षातील ठेकेदारी संस्कृतीवर थेट प्रहार झाला. अनेक ठेकेदारी कामांशी संबंध असलेल्या कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या विधानाचा परिणाम म्हणून पक्षात नव्या उमेदवारांना पुढे आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून, नेतृत्वानेही ठाम भूमिका घेतल्याचे समजते.

आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तिकीट वाटपाच्या वेळी जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. जुने कार्यकर्ते आपली वर्षानुवर्षांची निष्ठा आणि अनुभव मांडतील, तर नवे कार्यकर्ते जनतेशी असलेला संपर्क, कामगिरी आणि स्वच्छ प्रतिमा हे आपले बलस्थान ठरवतील.या संघर्षात पक्ष नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. परंतु, अजित पवार यांच्या “कामगिरी आणि स्वच्छता हा एकमेव निकष” या भूमिकेमुळे नव्या कार्यकर्त्यांना वरचष्मा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

इंदापूर तालुक्यात ठेकेदारीचा मुद्दा नव्याने डोके वर काढत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठेकेदारी विरुद्ध जनतेचे राजकारण हा मुद्दा ठळकपणे पुढे येणार आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. मतदार आता ठेकेदारी राजकारण करणाऱ्या आणि विकासाच्या नावाखाली वैयक्तिक फायद्यासाठी काम करणाऱ्या नेत्यांना नाकारतील, अशी शक्यता आहे.जनतेला स्थानिक समस्यांवर उपाय, पारदर्शक निधी वापर आणि खऱ्या अर्थाने विकासाचे राजकारण अपेक्षित आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वावर जबाबदारी मोठी आहे. पक्षात नव्या दमाला संधी देणे म्हणजे केवळ चेहरा बदलणे नाही, तर कामकाजाची दिशा बदलण्याची संधी आहे.

एकूणच, इंदापूर तालुक्यात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचा निर्णय हा संघटनेच्या पुनर्बांधणीचा आणि जनतेशी पुनर्संवाद प्रस्थापित करण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.जुन्या ठेकेदारी प्रवृत्तीला आवर घालून प्रामाणिक, कार्यक्षम आणि तळागाळाशी जोडलेले नवे नेतृत्व उभे राहिले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्यात आपले वर्चस्व सिद्ध करू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!