वकिलवस्ती गावातील निराधार महिलांना ‘मैत्री ग्रुप’कडून दिवाळी भेट.
स्नेह, सामाजिक जबाबदारी आणि आनंदाचा अनोखा संगम!

इंदापूर,दि.२१
- इंदापूर तालुक्यातील वकिलवस्ती गावात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीचा सुंदर नमुना पाहायला मिळाला. ‘मैत्री ग्रुप’ या तरुणांच्या संघटनेतर्फे गावातील निराधार महिलांना दिवाळी भेटवस्तू देऊन सणाचा आनंद सर्वांसोबत वाटण्यात आला.
दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि एकात्मतेचा सण. परंतु समाजातील काही घटक आर्थिक आणि सामाजिक अडचणींमुळे या आनंदापासून वंचित राहतात. हे लक्षात घेऊन ‘मैत्री ग्रुप’ने समाजातील अशा निराधार मातांना सन्मानपूर्वक भेट देऊन दिवाळीचा आनंद त्यांच्या घरापर्यंत पोहोचविला.
या उपक्रमात श्री. सिद्धेश्वर भोसले(सर्कल भाऊसाहेब), संदीप शिंदे(सर्कल भाऊसाहेब), विनायक भांडे, विजय भोळे आणि बापूराव भोसले यांनी मन:पूर्वक सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले असून, महिलांनीही कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
या उपक्रमाची माहिती ग्रुपचे प्रतिनिधी व माजी उपसरपंच श्री. सुभाष भोसले यांनी दिली. त्यांनी सांगितले की, “दिवाळी हा आनंद वाटण्याचा सण आहे. समाजातील प्रत्येक घटकाला या प्रकाशोत्सवाचा आनंद मिळावा, हीच आमची भावना आहे.”
गावकऱ्यांनी या सामाजिक उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले असून, अशा प्रकारच्या संवेदनशील उपक्रमांमुळे गावातील एकोपा आणि मैत्रीची भावना अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘मैत्री ग्रुप’चा हा दिवाळी उपक्रम म्हणजे समाजात आशेचा आणि मानवतेचा दिवा पेटविणारा एक प्रेरणादायी प्रयत्न ठरला आहे.



